
ह्या शुभ रात्री शेजारच्या मारुतीच्या देवळात रात्री साधारण दहाच्या सुमारास भजन सुरु झाले. रात्री श्रीकृष्णाचा जन्म होई पर्यंत चालू असावे.
असावे म्हणाले कारण मला भजन संपायच्या आधीच झोप लागली. खूप शांत झोप. कित्येक वर्षांत भजन ऐकता-ऐकता झोपण्याचे भाग्य लाभले नव्हते. ते काल रात्री जमले.
खरे तर भजन म्हणणाऱ्या लोकांचे आवाज काही खूप खास नव्हते. पण तरीही खूप तन्मयतेने भजन चालू होते. टाळ-मृदुंग, आणि हरी नामाचा जप ह्याने आसमंत दुमदुमून गेला होता. हवेतील कुंद गारवा भजनाचे आवाज दश-दिशांना घुमवत होता.
मला आठवण झाली काही वर्षांपूर्वीची. आमच्या घराजवळच्या मारुतीच्या मंदिरात दररोज रात्री भजन होत असे. तेव्हा रात्री झोपताना भजनाचे हलके स्वर आणि टाळ. खूप आल्हादायक वातावरण व्हायचे. तेच काल रात्री अनुभवायला मिळाले.
आज-काल भजन पण ओघानेच ऐकायला मिळते. गावा-पाड्यात अजून होत असतील रात्रीची. पण शहरात अभावानेच.

भजनाकरिता काही सुरेख आवाज असण्याची गरज नाही. मनात भाव असला की ते थेट अंतःकरणात भिडते. म्हणूनच भजन म्हणायला कोणी "Indian Idols" लागत नाहीत. भोळे-भाबडे, कष्टकरी लोक जमवले की झाले.
थोड्याच वर्षांमध्ये आपले म्हातारे-कोतारे लोके पण नाहीशी होतील, तेव्हा भजन म्हणजे काय हे सुद्धा
सांगणारे उरणार नाहीत. तोवर आपण भजनाच्या रंगी रंगून जाऊयात.